मुख्याधिकारी समस्या सोडविण्यासाठी खालापूरात रहा !

* खालापूर नागरिकांचे मुख्याधिकारी यांना निवेदन 

खालापूर / प्रतिनिधी :-  नगर पंचायत हद्दीतील समस्या खालापूर नागरिकांची पाठ सोडण्यास तयार नसून नव्याने नगर पंचायत मुख्याधिकारी पदाचा पदभार स्विकारलेल्या कोमल कराळे यांनी खालापुरात राहण्याचा अनुभव घेत समस्या मार्गी लावावे, असे निवेदन ग्रामस्थांकडून देण्यात आले आहे. 


नगर पंचायत खालापुरची पेयजल योजनेचे काम रखडलेले आहे. यामुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा अद्याप उतरलेला नाही. पाताळगंगा नदीचे दूषित आणि चिखल युक्त पाणी नागरिकांना वापरावे लागत आहे. करोडोंचा निधी खर्च केल्याचे दाखवित असताना मूलभूत सुविधांची वाणवा आहे. तालुक्याच्या ठिकाणी वाहन तळ सुविधा नसल्याने कामानिमित्त शासकीय कार्यालयात येणारे नागरिक आणि शासकीय अधिकारी यांची वाहन खालापुरातील हमरस्त्यावर तसेच नागरिकांच्या घरासमोर उभे राहत असल्याने मोठी  गैरसोय होते. विविध साथीचे आजार पावसाळ्यात डोकेवर काढतात तरी देखील कुठेही धूर फवारणी होताना दिसत नाही. 


सर्व समस्याची जंत्री घेऊन खालापुरातील सामाजिक कार्यकर्त्या क्षमा आठवले, योगेश जाधव, गणेश पारंगे, दीपक जगताप, मनोज कळमकर, सचिन पारठे, गणेश साळुंखे, श्री पाष्टे यांच्यासह नागरिकांनी या समस्यातून मार्ग काढण्यासाठी मुख्याधिकारी कोमल कराळे यांनी खालापूरात वास्तव्य करावे, असे लेखी निवेदन दिले. मुख्याधिकारी यांच्या अनुपस्थित कार्यालयीन अधिकारी जितेंद्र यादव यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यादव यांनी मुख्याधिकारी कर्जत येथे बैठकीसाठी असल्याचे सांगून लवकरात लवकर नागरिकांसोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

Previous Post Next Post