* उत्कर्ष उत्तम ठाकूर याचे सर्वत्र कौतुक
उरण / विठ्ठल ममताबादे :- तालुक्यातील खोपटे- धसाखोशी येथील उत्कर्ष उत्तम ठाकूर याची वयाच्या २१ व्या वर्षीच महाराष्ट्र पोलिस तसेच राज्य राखीव पोलिस दल या दोन्ही विभागात निवड झाली आहे. लहानपणीच आपल्या मनाशी खूणगाठ बांधत देश सेवेचे स्वप्न उराशी बाळगून असणारा उत्कर्ष याने अत्यंत कठीण काळात या दोन्ही विभागात मोठी कामगिरी करीत आपली छाप सोडली आहे.
वडील घर बांधण्याचे काम करतात. घराची परिस्थिती बेताची असतांना सुद्धा दहावी आणि नंतर बारावी परीक्षेत चांगले गुण असताना सुद्धा फक्त देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या उत्कर्ष याने बेलापूर येथे श्री करिअर अकॅडमीमध्ये प्रवेश घेवून आपला सराव चालू केला. कोरोना काळात बस उपलब्ध नाही म्हणून पहाटे लवकर उठून तो टाउनशिपपर्यंत चालत जात असे, पण तो थांबला नाही. थकला नाही आणि सरते शेवटी त्याची मेहनत, जिद्दी आणि संयमाने महाराष्ट्र पोलिस मुंबई विभाग तसेच राज्य राखीव पोलिस दलामध्ये त्याची निवड झाली. त्याच्या या यशाबद्दल पंचक्रोशीतून त्याचे अभिनंदन होत आहे. व्हाट्सअप, फेसबुक आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उत्कर्ष ठाकूर याचे अभिनंदन केले आहे.