न्याय आपल्या दारी

* रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने  जिल्ह्यात फिरते लोक अदालतीचे उद्घाटन

रायगड / प्रतिनिधी :- रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्ह्यात ‘न्याय आपल्या दारी’ ही संकल्पना फिरते लोक अदालतीचे जिल्हा न्यायालयात उद्घाटन प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश सृष्टी निळकंठ, वकील संघटना अध्यक्ष ॲंड. प्रसाद पाटील यांच्या  उपस्थितीत करण्यात आले. या संकल्पनेंतर्गत मोबाईल व्हॅनमधून फिरते लोक अदालत गावागावांत पोहोचणार आहे. 

या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश क्र. 2 एन. के. मणेर, रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव वरिष्ठ न्यायाधीश अमोल शिंदे, जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधीश, न्यायिक वर्ग कर्मचारी उपस्थित होते. 

'न्याय आपल्या दारी’ या फिरत्या लोक अदालतीकरीता निवृत्त न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये यांची कक्ष न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.   

ग्रामीण भागातील जनसामान्यांना आर्थिक वा अन्य अडचणींच्या कारणास्तव न्याय व्यवस्थेपर्यंत पोहोचता येत नाही. परिणामी, त्यांना न्यायापासून वंचित रहावे लागते, अशी परिस्थिती राहू नये, याकरिता मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समितीच्या आदेशान्वये रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्ह्यात ‘न्याय आपल्या दारी’ ही संकल्पना अंमलात आणण्यात आली आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात 3 मार्च ते 29 मार्च या कालावधीमध्ये मोबाईल व्हॅनद्वारे लोक अदालतीचे व विधी सेवा समितीचे जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

मांडवा सागरी पोलिस ठाणे हद्दीत फिरते लोक न्यायालय पोहोचणार असून, तेथे ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रलंबित दिवाणी, फौजदारी प्रकरणे व पोलिस ठाण्यातील वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. पुढील काळात हे फिरते न्यायालय जिल्ह्यातील मुरुड, रोहा, पेण, पनवेल, कर्जत, खालापूर, पाली, माणगाव, महाड, श्रीवर्धन, पोलादपूर या तालुक्यात जावून कामकाज करणार आहे. या संधीचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post