* तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन
खालापूर / सुधीर देशमुख :- आगामी गुढीपाडवा, रमजान ईद, महावीर जयंती, श्रीराम नवमी, हनुमान जयंती, भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सण व उत्सव शांततेत पार पडण्याच्या दृष्टीने खालापूर पोलिस स्टेशन येथे शांतता मोहल्ला कमिटी, पोलिस पाटील यांची एकत्रित बैठक उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या अध्यक्षतेखाली व पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस निरीक्षक संतोष आवटी यांच्या उपस्थितीत पार पडली.
या बैठकीमध्ये शांतता मोहल्ला कमिटीकडून कोणत्या प्रकारे काम केले पाहिजे तसेच सोशल मिडीयावर प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह मेसेजला कशाप्रकारे आळा घालता येईल व त्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राहण्याच्या दृष्टीने योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
धार्मिक जातीय तेढ निर्माण करणाऱ्या, जातीय सलोखाला हानी पोहोचविणाऱ्या, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहचविणाऱ्या, एखाद्या विशिष्ट समाजाला भडकविणाऱ्या कोणत्याही पोस्ट, संदेश सोशल मीडियाद्वारे पोस्ट करू नका किंवा अशा प्राप्त झालेल्या पोस्ट शेअर करू नका. जो कोणी असे पोस्ट करीत असतील त्यांची माहिती पोलिस ठाण्यात देण्यात यावी. तसेच आपल्या मार्फत त्यांना योग्य ती समज देण्यात यावी...कोणत्याही घटनेच्या पार्श्वभूमीविषयी संपूर्ण पडताळणी केल्याशिवाय आणि त्याबाबत सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय अशा घटनेबाबत सार्वजनिकरित्या किंवा सोशल मीडियावर विचार व्यक्त करू नका. त्याबाबत समाजामध्ये अफवा पसरू नये किंवा अफवावर विश्वास देखील ठेवू नये...जातीय सलोखा बिघडेल असे कोणतेही कृत्य करू नये...कोणत्याही धर्माच्या व्यक्तीच्या व्यक्तिगत किंवा सार्वजनिक भावना दुखावतील अशा प्रकारे स्टेटस किंवा पोस्ट सोशल मीडियावर शेअर करू नये किंवा व्हायरल करू नये...आगामी काळामध्ये सर्वधर्मीय सण, उत्सव साजरा केले जाणार आहेत. सदर सण शांततेत साजरे करण्यात यावेत याबाबत दक्षता घेण्यात यावी. तसेच आगामी काळामध्ये खालापूर पोलिस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या.