* ठाकरेच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख नागेश पवार आक्रमक
ठाणे / अमित जाधव :- ठाणे महापालिका हद्दीतील दिव्यातील दातीवली तलावाच्या सुशोभिकरण कामाची घरघर सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत दातीवली तलावाचे संवर्धन व सुशोभिकरणाचे काम १८ एप्रिल २०२३ रोजी १२ महिन्यांच्या मदतीसह मे. यु. सी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांना देण्यात आले होते. परंतु सदरचे काम विहित मुदत पूर्ण होऊन देखील रखडलेले दिसून येत असून मुदत संपल्यानंतर मुदतवाढ न घेता कंत्राटदाराने कामगारांच्या विम्याचे नूतनीकरण न करता परस्पर जानेवारी २०२५ ला काम सुरु करून कंत्राटी कामगारांचा जीव धोक्यात टाकून बिनधास्तपणे कंत्राटदाराने केले आहे. सध्या ही तलावाची परिस्थिती 'जैसे थे' असून याकडे दुर्लक्ष करून महापालिकेच्या कार्यपद्धती व सूचनांना पायदळी तुडविण्याचे काम ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांनी केले असल्याचे दिसून येत असल्याचे ठाकरे शिवसेनेचे विभागप्रमुख नागेश पवार यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
या प्रकरणी रखडलेल्या दातीवली तलावाच्या सुशोभिकरण कामाची संबंधित ठेकेदार व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात यावी तसेच कंत्राटी मजुरांच्या संरक्षण विम्याचे नूतनीकरण व संबंधित कामाला पालिकेची मुदतवाढ मिळेपर्यंत कामबंद करण्यात यावे, असे लेखी निवेदन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना ठाकरे शिवसेनेचे दिवा विभाग प्रमुख नागेश पवार यांनी दिले आहे.