* पत्रकार ॲंक्ट कायद्यांतर्गत कार्रवाई करण्याची पत्रकार सुरक्षा समितीची मागणी
तुळजापूर / प्रतिनिधी :- पत्रकार हा चौथास्तंभ असून जनतेपर्यंत चालू घडामोडी पोचवण्याचे काम करणारा जनतेच्या व शासनामधील तो दुवा असून पत्रकाराबाबत शासनाने अनेक कायदे केले आहेत, पण कायदा कागदावरच का ? असा प्रश्न निर्माण झाला असून यापूर्वी पत्रकारांविषयी गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्रवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. परंतु तुळजापूरमध्ये पत्रकारांना अर्वाच्च भाषेमध्ये बोलून अपमानित करण्याची घटना तुळजापूर येथील तहसील कार्यालय येथे घडली आहे. याबाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे कार्रवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, 25 फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांचे बेकायदेशीर वीटभट्टीबाबत सामूहिक आत्मदहन तहसील कार्यालय येथे होणार असल्याची माहिती पत्रकार बांधवांना मिळाल्यानंतर पत्रकार बांधव हे आंदोलनस्थळी बातमी संकलनासाठी गेले असता तुळजापूर तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी पत्रकारांना बातमी संकलन करीत असताना अरेरावीची भाषा करीत...तुम्ही अगोदर बाहेर जा, शुटींग करू नका, मला माहित आहे पत्रकार कसे असतात ते...असे म्हणून उद्धट वर्तन करून वाद घालण्याचा प्रयत्न केला व पत्रकारांना अपमानित केले. या आंदोलनस्थळी तुळजापूर पोलिस निरीक्षक अनिल मांजरे यांच्या मदतीने हे आंदोलन स्थगित करण्यात आले असता सर्व पत्रकार हे तहसीलदार यांच्या केबिनमध्ये गेले असता आंदोलन संदर्भाबाबत प्रतिक्रिया द्या, असे म्हणताच तहसीलदार यांनी पत्रकार यांना प्रतिक्रिया न देता पत्रकारांना अरेरावी करून केबिन बाहेर जाण्याचा हुकूम सोडला.
पत्रकारांच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या मुजोर व कर्तव्यहिन तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. तत्काळ निलंबित नाही केल्यास महाराष्ट्रातील सर्व पत्रकार सनदशीर मार्गांने राज्यभर आंदोलन करतील, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर पत्रकार सुरक्षा समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष प्रवीण राठोड, जिल्हा अध्यक्ष राहुल कोळी, जिल्हा उपाध्यक्ष रुपेश डोलारे, मकबुल तांबोळी, हैदर शेख, सारिका चुंगे, लहू कुमार शिंदे, चांद शेख, गणेश कांबळे, सलीम पठाण, आकाश हळकुंडे व अन्य पत्रकार बांधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदर निवेदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री प्रताप सरनाईक, पोलिस अधीक्षक धाराशिव यांना हे निवेदन देण्यात आले आहे.