परभणी / प्रतिनिधी :- महामानव डॉं. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अखंड ठेवणारे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान दिले आहे. या संविधानाची शपथ घेऊन मंत्री, लोकप्रतिनिधींना पदग्रहण करावे लागते. संविधानानुसार देश चालतो. ज्यांना संविधान मान्य नाही, त्यांनी या देशातून चालते व्हावे, अशी प्रतिक्रिया आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
परभणी येथील महामानव डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तेथे संविधानाचा अवमान झाल्याच्या घटनास्थळाची पाहणी ना. रामदास आठवले यांनी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परभणीतील संविधान अवमान प्रकरणाची माहिती घेतली
यावेळी आरोपीची नार्को टेस्ट करण्याची व सर्व चौकशी करण्याची सर्व आंबेडकरी समाजाची मागणी आहे, त्याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाची ही आरोपीची नार्को चाचणी करण्याची मागणी आहे. संविधानाचा अवमान करणाऱ्या आरोपी मागे कोण सुत्रधार आहे ? कुणाचा हात आहे ? हे शोधण्यासाठी स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, त्यांना जमत नसेल तर या प्रकरणी क्राईम ब्रांचने चौकशी करावी, अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली.
10 डिसेंबर रोजी संविधान अवमानाचा प्रकार परभणीत घडल्यानंतर आंबेडकरी जनतेने उत्स्फूर्त निषेध आंदोलन परभणीत केले. संविधान अवमान प्रकरणाचा आम्ही तीव्र निषेध करतो. त्यानंतर निषेध आंदोलनात आंबेडकरी जनतेने कुणाचेही मोठे नुकसान केलेले नाही. तुरळक ठिकाणी केवळ 2 गाड्यांच्या काचा आणि काही दुकानाच्या नामफलकाचे नुकसान झाले आहे. या आंदोलनात विद्यार्थी, महिला आणि निर्दोष कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवू नयेत. ज्या पोलिसांनी महिला आणि शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर अति प्रमाणात मारहाण केली आहे, वस्तीच्या पार्किंगमधील गड्या फोडल्या आहेत. त्या पोलिसांची ही चौकशी व्हावी. काही समाजकंटक यांनी पोलिसांसोबत आंबेडकरी आंदोलकांवर हल्ले केले आहेत, त्यांचे व्हिडिओ पाहून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली आहे.
अटक 42 आंदोलकपैकी 10 जणांना जामीन मिळाला आहे. पोलिस किंबिंग ऑपरेशन करणार नाहीत, निर्दोष व्यक्तींवर गुन्हे दाखल करणार नाहीत, असे शांतता कमिटीत ठरले असल्याची माहिती पोलिसांनी आपल्याला दिल्याचे ना. रामदास आठवले यांनी सांगितले.
याप्रकरणी आपण दिल्लीत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो. परभणीत किंबिंग ऑपरेशन करू नये आणि निर्दोष व्यक्तींवर गुन्हे दाखल होऊ नयेत याबाबत आपण मागणी केल्याचे ना. रामदास आठवले यांनी आज परभणीत पत्रकारांना सांगितले.