* रस्त्यांवर प्लास्टिकचे अर्धेच गतिरोधक का ?
* नगर परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ?
खोपोली / खलील सुर्वे :- खोपीली नगर परिषद हद्दीतील शेडवली, चिंचवली, शास्त्रीनगर, काटरंग, वासरंग, डीपी रोड, खालची खोपोली, तांबडी आदी परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. पावसाळा सुरु होण्याआधी कोट्यवधी रुपये खर्च करून अनेक भागात नगर परिषद प्रशासनाने नवीन डांबरी व सिमेंट काँक्रीटचे सुंदर रस्ते बनविले होते. मात्र, केबल लाईन, गँस लाईन, भुयारी गटारसाठी रस्ते खोदल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.
या रस्त्यांवर प्रत्येक वर्दळीच्या ठिकाणी नगर परिषदेने प्लास्टिकचे नवीन तंत्रज्ञाने (Technology) बनविलेले रेडिमेड तुकड्या तुकड्याचे रंगीत गतिरोधक लावले आहेत. या आधी डांबरी रस्त्यावर डांबरचे गतिरोधक बनविण्यात येत होते. डांबरी रस्त्यांच्या कामातच डांबरचे गतिरोधक मोफत केले जात होते. मात्र, आता नवीन तंत्रज्ञाने (Technology) बनलेले लाखों रुपये किंमतीचे प्लास्टिकचे गतिरोधक रस्त्यांवर खर्च करून लावले जात आहेत. मात्र तुकड्या तुकड्याचे गतिरोधक अवघे काही महिन्यातच अर्धे चंद्रावर तर अर्धे जमिनीवर राहिले असल्याचे चित्र खोपोली शहरात पाहिल्यावर दिसून येत आहे. रस्त्यांवर गतिरोधक निघून गेलेल्या ठिकाणी अर्धवट राहिलेल्या गतिरोधकामुळे दुचाकी, रिक्षा, कार चालक गतिरोधक नसलेल्या ठिकाणाहून सुसाट गाड्या पळवतात त्यामुळे दररोज अनेक छोटे-मोठे अपघात होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. तसेच हे गतिरोधक लोखंडी खिळे किंवा अँकर फासनर बोल्टवर लावले जातात. ह्या गतिरोधकाचे एक किंवा चार तुकडे निघाले की खिळे व बोल्ट रस्त्यावर निघून राहिल्याने गाड्यांचे टायर पंचर होतात. बांधकाम विभागाच्या अभियंतांना हे गतिरोधक निघाल्यावर हे बोल्ट, खिळे टारात घुसून टायर फुटणे अथवा पंचर होणे याचा अभ्यास नाही का ? हे गतिरोधक किती दिवस, किती महिने, किती वर्ष टिकाऊ आहेत याचा टेस्ट रिपोर्ट यांनी पहिला आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खोपोली शहरात दरवर्षी खड्ड्यांच्या कामासाठी लाखों रुपये ओतल्यानंतरही नागरिकांची खड्ड्यांतून काही सुटका झालेली नाही. पावसाळा आला, की रस्त्यांवर खड्डे पडतात. इतरही वेळी ते असतात, परंतु पावसाळ्यात जास्त जाणवतात. रस्त्यांवर खड्डे का पडतात ? रस्त्यांचे काम कशा पद्धतीने केले पाहिजे ? खोदाईची कामे असली, तरी नंतर रस्ता नीट करण्यासाठी काय नियम आहेत, या आणि अशा प्रश्नांची उत्तरे बांधकाम विभागाचे अभियंता देण्याचे कष्ट का करीत नाहीत ? पत्रकारांनी माहिती घेण्यासाठी खोपोली नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता अनिल वाणी यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता साहेबांनी पत्रकारांचा फोन उचलण्याचे कष्ट देखील घेतले नाहीत.
खोपोली नगर परिषद हद्दीत एका गावातील गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची लेखी तक्रार नागरिकांनी केली व अशा कामचुकार, आळशी, बेजबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे आपले व खोपोली नगर परिषद प्रशासनाचे नाव खराब होत असते, तरी लवकरात लवकर आमच्या अर्जावर कार्रवाई करण्यात यावी व कार्रवाई काय करण्यात आली याची माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. मात्र नगर परिषदेने ह्या लोकसेवकांवर कोणती कार्रवाई केली याची माहिती दिली नाही.