* केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी
लखनऊ / प्रतिनिधी :- ज्याप्रमाणे अपना दल, निषाद पक्षाला उत्तर प्रदेश सरकारमध्ये हिस्सेदारी मिळाली, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांनाही उत्तर प्रदेशमध्ये सत्तेचा वाटा मिळायला हवा. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधून 70 जागा मिळण्याच्या भाजपच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. भाजपला स्वबळावर केवळ 33 जागा मिळाल्या आहेत. संविधान बदलणे, आरक्षण हटवणे या विरोधी पक्षांच्या खोटेपणामुळे भाजपचे नुकसान झाले आहे. म्हणून भाजपने उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत युती करुन जागा वाटपात काही जागा रिपब्लिकन पक्षाला द्यायला हव्यात, अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल ना. रामदास आठवले यांचा भव्य सत्कार लखनऊ येथे रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात आला. त्यावेळी ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपाइंचे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता, भदंत आनंद बोधी, रहुलन अंबवडेकर, उमाशंकर चौधरी, अजय अग्रवाल, रुची शुक्ला, जावेद तोमर, गणेश प्रसाद, अशोक शर्मा, शैल श्रीवास्तव, सलीम मलिक आदी उपस्थित होते.
