मनसे स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार !

 

* राज ठाकरे यांची मोठी घोषणा

* 225 ते 250 जागा मनसे लढेल

मुंबई / प्रतिनिधी :- राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. किमान 225 ते 250 जागा मनसे लढेल, असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे आगामी निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकसभेनंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महाविकास आघाडी व महायुती या दोन प्रमुख आघाड्यांनी तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीने समन्वय समितीही स्थापन केली आहे. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्षही तयारीला लागला आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबईत झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. राज्यातील राजकीय परिस्थिती विचित्र आहे. कोण कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही. येत्या निवडणुकीत ह्या सगळ्या राजकीय पक्षात जे काही घमासान होणार आहे, ते न भूतो भविष्यती असेल, असे ते म्हणाले. मात्र, महाराष्ट्राचे प्रश्न हेच आपल्या पक्षाचे प्रचाराचे मुद्दे असतील, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

* पक्ष सोडणाऱ्यांना मीच रेड कार्पेट घालेन :-

आपल्या पक्षातील एक-दोन पदाधिकारी दुसऱ्या पक्षात जाणार आहेत असे मला कळले. अशा लोकांनी जावे म्हणून मी स्वत: लाल गालिचा घालेन. ज्यांना स्वत:च्या भविष्याचा सत्यानाश करून घ्यायचा असेल त्यांंनी खुशाल जावे. मुळात त्या पक्षांचंच स्थिर नाही तर तुम्हाला काय मिळणार, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

* मनसेचे लोक मला सत्तेत बसवायचेत :- 

आपल्या पक्षातीलच चार-चार, पाच-पाच जणांची एक टीम केली आहे. ते राज्यातील जिल्हे व तालुक्यांमध्ये फिरले आहेत. त्यांनी सर्वांशी चर्चा केली आहे. त्याचा रिपोर्ट माझ्यापर्यंत आला आहे. आता ते पुन्हा जिल्ह्यात जाणार आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. त्यांना योग्य माहिती द्या, असे राज यांनी सांगितले. निवडून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाच तिकीट दिले जाईल. निवडून आल्यावर मी पैसे खायला मोकळा असा हेतू असणाऱ्या कोणालाही तिकीट दिले जाणार नाही. त्यामुळे आपल्या समितीला प्रामाणिकपणे माहिती द्या. ऑगस्टपासून मी स्वत: राज्याचा दौरा करणार आहे. येत्या निवडणुकीनंतर कोणत्याही परिस्थितीत मला आपले लोक सत्तेत बसवायचे आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post