* अन्यथा मुख्यमंत्र्यांना बीआरएस महिला आघाडीतर्फे बांगड्यांचा आहेर देणार - कोमलताई पाटील
चोपडा / महेश शिरसाठ :- कोळी समाजाला टोकरे कोळी जमातीचे सर्टिफिकेट देण्यात शासन चालढकलपणा करीत असून आता ते खपवून घेतले जाणार नाही. लवकर न्याय न मिळाल्यास मुख्यमंत्री साहेबांना आम्ही या पुढे बांगड्यांचा आहेर देऊ, असा इशारा भारत राष्ट्र समितीच्या जळगाव जिल्हा महीला आघाडीच्या जिल्हा प्रमुख कोमलताई पाटील यांनी दिला आहे.
आदिवासी कोळी जमातीच्या व्यक्तींना टोकरे कोळी जमातीचे दाखले मिळावेत, यासाठी १५ जुलै रोजी अमळनेर प्रांत कार्यालयावर भव्य बिऱ्हाड मोर्चा व ठिय्या आंदोलन मोर्चा काढण्यात आला. त्याप्रसंगी कोळी समाज बांधवांशी चर्चा करतांना त्या बोलत होत्या. मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा बैठक लावली मात्र, काही मंत्र्यांच्या दबावाखाली ती रद्द करण्यात आली आहे. आता ती बैठक लवकर लावावी व समाजाला न्याय द्यावा अन्यथा बीआरएस महिला संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा येईल व मुख्यमंत्री महोदयांना बांगड्यांचा आहेर देऊ, असा इशारा दिला आहे. यावेळी कोळी समाजाचे कार्यकर्ते जगन्नाथ बापू बाविस्कर, मधुकर सोनवणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.
