कर्जत / प्रतिनिधी :- बिहार राज्यातील बुद्धगया महाबोधी महाविहार हे संपूर्ण बौध्द बांधवांचे अतिशय महत्वाचे प्रार्थनास्थळ असून ऐतिहासिक धरोवर आहे. देशाबरोबर जगभरातील अनुयायांच्या भावना याच्याशी जोडल्या आहेत, त्यानुषंगाने येथील बौद्ध महाविहाराचे पावित्र्य जपणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. परंतु या महाविहारामध्ये अनेक घटना घडत आहेत, यामुळे विहाराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अशा पवित्र ठिकाणी अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचे काम बऱ्याच वर्षांपासून होत आहे आणि हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि या सर्वांचेच कारण म्हणजे तेथील असलेला व्यवस्थापन समिती कायदा 1949 हा आहे.
या कायद्यामुळे तेथील व्यवस्थापन समितीतील बौद्धभिक्षु व्यतिरिक्त इतर सदस्य महाविहाराचे अस्तित्व धोक्यात येईल अशा गोष्टी सातत्याने करीत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन तमाम बौद्ध भिक्षुगण आणि बौद्ध बांधव अस्तित्वात असलेला व्यवस्थापन समिती कायदा 1949 रद्द करून संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध भिक्षुकडे देण्यात यावे, याकरिता भिक्षुगण गेली 21 दिवस उपोषण करीत आहेत. याची सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसून वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून संपूर्ण देशातील आणि महाराष्ट्रातील बौद्ध बांधवाना आव्हान करण्यात आले असून वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड, महासचिव धर्मेंद्र मोरे यांच्या नेतृत्वात महामाहीम राष्ट्रपती, भारत सरकार यांना रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या त्वरीत मान्य करण्यात याव्यात, अन्यथा संपूर्ण देशात तीव्र आंदोलन करण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी असे निवेदन जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आले आहे. आपलं निवेदन मा. राष्ट्रपती महोदया पर्यंत पोहचविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड, महासचिव धर्मेंद्र मोरे, संघटक राहुल गायकवाड, उपाध्यक्ष देवेंद्र कोळी, चंद्रकांत साळुंखे, सदस्य अशोक वाघमारे, सुनील गायकवाड, कर्जत अध्यक्ष प्रदीप ढोले, लोकेश यादव, शैलेश खोब्रागडे, खोपोली अध्यक्ष सुमित जाधव, सुधागड अध्यक्ष स्वप्नील गायकवाड, खालापूर महासचिव उत्तम ओव्हाळ, पंकज गायकवाड, पनवेल शहर अध्यक्षा छायाताई शिरसाठ, खांदा कॉलनी अध्यक्षा कविताताई वाघमारे, तायडे गुरुजी, प्रफुल कदम, गणेश बनसोडे, भगवान खंडागळे, विठ्ठल पवार, सुभाष गायकवाड, चंद्रकांत जगताप, तुकाराम शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील इतर पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
