* निर्जनस्थळी गोवंश जनावरांची हत्या करून मांस नेल्याची धक्कादायक घटना
कर्जत / प्रतिनिधी :- कर्जत तालुक्यातील नांगुर्ले गावाच्या हद्दीत दामखिंडी दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगत निर्जनस्थळी गोवंश जनावरांची हत्या करून मांस नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासानुसार दोन ते तीन गायी अथवा बैल चोरी करून या ठिकाणी आणले गेले आणि त्यांची निर्घृण हत्या करून मांस नेले गेले. यामुळे गोवंश तस्करी करणाऱ्यांनी नवीन पद्धतीचा अवलंब केल्याची चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीवरून कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गायकवाड आणि त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सध्या पोलिस या घटनेचा सखोल तपास करीत आहेत. या जनावरांची चोरी कोठून झाली आणि मांस नेण्याचा उद्देश काय होता, याचा शोध घेतला जात आहे. याच परिसरात काही महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारे गोवंश जनावरांची हत्या करून मांस नेल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही काळापासून पोलिस प्रशासन गाड्यांची तपासणी अधिक कठोरपणे करीत आहेत. तरीही तस्करांनी निर्जनस्थळांचा वापर करून आपली कृत्ये लपविण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेबाबत नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून, कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे सांगितले आहे.