न्यूझीलंडला नमवित भारत बनला 'चॅंम्पियन्स'

* मालिकेत अजेय कामगिरी करीत तिसऱ्यांदा जिंकली चॅम्पियन ट्रॉफी

दुबई / प्रतिनिधी :- भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करीत चॅंम्पियन्स ट्रॉफी 2025 चे जेतेपद पटकावले आहे. भारताने न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात 4 विकेट्सने पराभव केला. जडेजाने 49 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत संघाला विजय मिळवून दिला. भारताने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता ही स्पर्धा आपल्या नावे केली आहे. अंतिम सामन्यात रोहित शर्मा 76 धावा करीत सामनावीर ठरला.

भारताच्या या विजयासह टीम इंडिया चॅंम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद तिसऱ्यांदा पटकाविणारा पहिला संघ ठरला आहे. यासह भारताने गेल्या 10 महिन्यात दुसरी आयसीसी स्पर्धा जिंकत ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. न्यूझीलंडने दिलेल्या 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने वादळी खेळी करीत संघाच्या विजयाचा पाया रचला. रोहित शर्माने 83 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 76 धावा केल्या, तर शुबमन गिलने 50 चेंडूत एका षटकारासह 31 धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलच्या भागीदारीने भारताला सामन्यात कायम ठेवले. श्रेयस अय्यर 62 चेंडूत 2 चौकार 2 षटकारांसह 48 धावा करीत बाद झाला. तर अक्षर पटेल 40 चेंडूत 1 चौकार 1 षटकारासह 29 धावा करीत बाद झाला. तर राहुल आणि हार्दिकने भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. तर रवींद्र जडेजाने विजयी चौकारासह भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

चॅंम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात 34 धावांची नाबाद खेळी खेळून टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर ठेवत राहुल नाबाद परतला. यावेळी त्याला हार्दिक पंड्याचीही साथ लाभली ज्याने 18 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. किवी संघाकडून मायकेल ब्रेसवेल आणि मिचेल सँटेनर यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतले.

न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पुन्हा एकदा भारताच्या फिरकी चौकडीने आपली कामगिरी चोख बजावली. भारताच्या फिरकी विभागाने चांगली कामगिरी करीत धावांवर अंकुश ठेवला आणि न्यूझीलंडला 251 धावांवर रोखले. रचिन रवींद्र आणि विल यंगने किवी संघाला अर्धशतकी भागीदारी रचत चांगली सुरूवात केली. पण रोहित शर्माची रणनिती आणि भारताच्या फिरकी विभागाने टीम इंडियाला सामन्यात परत आणले. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने 37 धावा, डॅरिल मिचेलने 63 धावा आणि ब्रेसवेलने 53 धावांची खेळी केली. भारताकडून कुलदीप यादव आणि वरूण चक्रवर्तीने 2 विकेट्स तर रवींद्र जडेजा-मोहम्मद शमीने 1-1 विकेट घेतली. रोहित शर्माने कमालीचे नेतृत्त्व करत संघाला विजय मिळवून दिला.


Post a Comment

Previous Post Next Post