* जनतेच्या समस्या त्वरीत सोडविण्याची मागणी
उरण / विठ्ठल ममताबादे :- उरण नगर पालिका हद्दीतील आनंद नगर परिसरात गेल्या महिन्याभरापासून अपुरा पाणीपुरवठा नगरपालिकेकडून होत आहे. दोन-दोन, तीन-तीन दिवस नगरपालिकेकडून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. या संदर्भात नगरपालिकेकडे नागरिकांनी लेखी व भेटी देऊन सांगितले आहे. तरीसुद्धा पाणीपुरवठा होतांना दिसत नाही. नगर पालिकेकडून या संदर्भात कोणतीही उपाययोजना होत नसल्याने शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस व लिबर्टी पार्क सोसायटीचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी शिष्टमंडळासमवेत नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांना निवेदन दिले.
यावेळी मुख्याधिकारी समीर जाधव यांनी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. लवकरात लवकर पाणी सुरळीत होण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत, यावेळी पाणी विभागाच्या प्रमुख वंजारी मैडम व संतोष कांबळे उपस्थित होते. आनंद नगरातील पाण्याचा पाईप गटारातून जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, त्याचबरोबर पाण्याचे प्रेशर वाढविणे पाण्याचे टाइमिंग फिक्स करणे जोपर्यंत नगर पालिकेकडून पाण्याचा नियमित पुरवठा होत नाही. तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करणे ज्या ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईन लिकेज आहे ते शोधून लिकेज काढणे तसेच एमआयडीसीकडून उरण शहराला अतिरिक्त पाण्याचा साठा वाढवून घेणे या बाबी शहर चिटणीस शेखर पाटील यांनी मांडल्या.
नगरपालिकेने या अगोदरच मंगळवार आणि शुक्रवार पाणीपुरवठा बंद केला असता नागरिकांना उर्वरित दिवसांत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नगर पालिकेची कोट्यवधींची थकबाकी एमआयडीसीकडे असल्यामुळे एमआयडीसी नगर पालिकेला पाणीपुरवठा करीत नाही असे समजते. या संदर्भात नागरिकांनी एमआयडीसीची असलेली थकबाकी नगर पालिकेने भरावी व नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली. त्याचबरोबर रानसई धरणाचा पाणीपुरवठ्याबरोबर हेटवणे धरणाचे पाणी नागरिकांसाठी घ्यावे अशा सूचना दिल्या. जर नागरिकांच्या पाण्याचा मूलभूत प्रश्न सुटला नाही तर घटनेच्या अधिकारानुसार आम्हास धरणे आंदोलन, मोर्चा या संविधानिक मार्गांचा अवलंब करावा लागेल. नगर पालिकेने लवकरात लवकर उरण शहराला सुरळीत पाणी पुरवठा करावा, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस व लिबर्टी पार्कचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी केले आहे. यावेळी शिष्टमंडळासमवेत प्रभाकर तांडेल, बेचैन परदेशी, रोहन म्हात्रे, शरद ठाकुर, जेष्ठ पत्रकार घनश्याम कडू, रवी म्हात्रे आदी उपस्थित होते.
