चौक / प्रतिनिधी :- सरनोबत नेताजी पालकर यांच्या जन्मगाव परिसरातील ऐतिहासिक गावात असलेल्या चौक व तुपगाव ग्रामपंचायत यांनी धनिक व बिल्डर यांच्या हितासाठी चौक व तुपगाव ग्रामपंचायतीचे गटाराचे घाण पाणी नैसर्गिक नाल्यात २१ फेब्रुवारी २०२३ पासून जेसीबीने जागोजागी खणून मोठाले खड्डे करून सोडले आहे.
या घाण व गटाराच्या पाण्याने चौक, तुपगाव, पाली परिसरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे शेतांचे, नागरी वस्तीचे डम्पिंग ग्राउंड केल्याने खरीप व रब्बी पिकांचे वाटोळे केले आहे व रोगराईचा फैलाव झाला आहे. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत शेतकरी व नागरिकांकडून सतत दोन वर्षे होणाऱ्या नुकसानीबाबत गाऱ्हाणे दोन्ही ग्रामपंचायती, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, पोलिस स्टेशन खालापूर, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, मुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. मात्र, केवळ मीटिंग, सुनावणी वारंवार करून ग्रामपंचायत सरकारी यंत्रणा यांनी याबाबत लक्ष घातले नाही. प्रत्यक्ष कृती न करता शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. तलाठीतील दोन पिके, सुपीक जमिनीचे होणारे नुकसान, अन्नदाता शेतकरी सहन करू शकत नाही. प्रजासत्ताक भारतात जमिनीच्या मालाला मिळणारा अत्यल्प भाव, जमिनीसाठी होणारा प्रचंड खर्च सहन करून बळीराजा आपली कृषी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करीत आहे. दोन्ही ग्रामपंचायत व सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांचे नागरिकांचे दुकान समजून न घेता या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत सतत दुर्लक्ष करीत असल्याने प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२५ रोजी तहसील कार्यालय खालापूर येथे आमरण उपोषण करणार असल्याचे शेतकऱ्यातर्फे पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.