नवी दिल्ली स्टेशनवर प्रयागराजला जाण्यासाठी गर्दी उसळली

* ट्रेन पकडताना चेंगराचेंगरीत १८ प्रवासी ठार

नवी दिल्ली / प्रतिनिधी :- प्रयागराज येथील महाकुंभाला जाणारी एक ट्रेन नवी दिल्लीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १३ वर येत असताना या ट्रेनला पकडण्यासाठी प्रमाणाच्या बाहेर गर्दी झाल्याने मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. ही ट्रेन पकडण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आले होते. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर गर्दी उसळली होती. त्यामुळे गुदमरल्यासारखे होऊन अनेक प्रवासी बेशुद्ध पडले. एकमेकांवर प्रवाशी पडल्याने महिला आणि मुलांना सर्वाधिक त्रास झाल्याने या दुर्घटनेत १८ जण ठार झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

दिल्ली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १३-१४ वर मोठी दुर्घटना घडली आहे. प्रयागराजला जाण्यासाठी ट्रेन पकडताना मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी होऊन किमान १८ प्रवासी ठार झाले आहेत. यात नऊ महिला,  चार मुले आणि पाच पुरुष प्रवासी ठार झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र, दिल्ली जीआरपी पोलिसांनी सुरुवातीला प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी झाल्याचे नाकारले होते. प्रवासी मोठ्या प्रमाणावर दगावल्याने रुग्णालयात अनेक जखमी प्रवाशांची प्रकृती नाजूक असल्याने हा आकडा आणखी वाढणार असल्याचे म्हटले जात आहे.

* रेल्वेचे म्हणणे काय ?

दिल्लीच्या रेल्वे पोलिसांनी घाईघाईत अनेक महिला आणि मुले, पुरुष प्रवाशांना रुग्णालयात नेले असे प्रत्यक्षदर्शींने सांगितले आहे. रुग्णालयात अफरातफराचेच चित्र असल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला तर प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी झालीच नाही असा अजब दावा पोलिसांनी केला होता. नंतर रेल्वे प्रशासनाने खरी माहिती सांगितली. जास्त गर्दीमुळे ही परिस्थिती उद्भवली असून १८ जण ठार झाले असून अनेक जखमींना रुग्णालयात दाखल केल्याचे एएनआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे. देशभरातून महाकुंभाला येणाऱ्या लोकांची दिल्ली स्थानकावर मोठी गर्दी उसळली होती. दिल्ली एनसीआरमध्येही अशीच परिस्थिती आहे. या आधीच लाखो भाविक महाकुंभाला पोहचले आहेत. परंतु तेथेही मौनी अमावस्येला मोठी चेंगराचेंगरी होऊन नुकतेच ३० जणांचा मृत्यू झाला होता.

Post a Comment

Previous Post Next Post