* ग्रामसभेचा ठराव : येणारे व्यापारी परंपरा पाळत नाहीत - सरपंच
अ. नगर / प्रतिनिधी :- पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या राज्यात प्रसिध्द असलेल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये यंदा मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालावी, असा ठराव ग्रामसभेने संमत केला. यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा असून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून यापूर्वी यात्रेकडे बघितले जात होते. पण या ठरावामुळे यात्रा वादात सापडण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील भटक्या समाजाची पंढरी म्हणून मढीच्या यात्रा प्रसिद्ध आहे. राज्यातील अठरापगड जातींच्या भाविकांचे कुलदैवत म्हणून कानिफनाथांकडे पाहिले जाते. शनिवारी सरपंच तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड यांनी त्यांच्याकडे विविध गावांच्या भाविकांच्या आलेल्या पत्राची दखल घेत ग्रामसभेपुढे विषय मांडला.
होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत यात्रा चालते. दरम्यान सरपंच तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड यांनी त्यांच्याकडे विविध गावांच्या भाविकांच्या आलेल्या पत्राची दखल घेत ग्रामसभेपुढे हा विषय मांडला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, एक महिन्यावर यात्रा आली असून बऱ्याच भाविकांच्या भावना तीव्र स्वरूपाच्या आहेत.
पारंपारिक पद्धतीनुसार देवाला महिनाभर अगोदर तेल लागलेले असते. असा कालावधी मढीच्या ग्रामस्थांच्या दृष्टीने दुःखवट्याचा असतो. त्यामुळे या काळात ग्रामस्थ तळण, लग्नकार्य, शेतीकामे, प्रवास असे कार्य पूर्णपणे बंद करून घरामध्ये पलंग, गादी सुद्धा वापरत नाहीत, महिनाभर कौटुंबिक सर्व कामे बंद ठेवून सर्व ग्रामस्थ नाथांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून देतात.
परंतु येथे येणारे व्यापारी ही परंपरा पाळत नाहीत, त्यामुळे हिंदूंच्या भावनांना ठेच बसली आहे. कुंभमेळ्याच्या धर्तीवर मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी केली तशी ग्रामसभेच्या ठरावांमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना मढी यात्रेमध्ये बंदी करण्यात आली आहे. जो व्यक्ती स्वतः कुंकू लावत नाही अन् त्याच व्यक्तीने आम्हाला कुंकू विकावे एवढी दुर्भाग्याची गोष्ट हिंदू धर्मासाठी म्हणावी लागेल. त्यामुळे भाविकांनी दिलेल्या पत्रामध्ये मुस्लिम समाजास यात्रेत दुकान लावण्यात बंदी करावी, त्यांच्याकडील खाद्यपदार्थ व प्रसादाची साहित्य घ्यावे लागते खाद्यपदार्थ वेगवेगळ्या प्रकारे दूषित करून हिंदूंच्या भावना दुखावतात अशा स्वरूपाचे भाविकांचे पत्र ग्रामपंचायतीला प्राप्त झालेले असून त्यानुसार मढी यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी करण्याचा ग्रामसभेचा ठराव करण्यात आला आहे.
